कारखान्यासह विधानसभेच्या निवडणुकीत ए. वाय.यांना बाय-बाय?
schedule05 Dec 23 person by visibility 788 categoryराजकीय

आवाज इंडिया
कोल्हापूर (प्रशांत चुयेकर)
कधी बिद्री साखर कारखान्यावर तर कधी राधानगरी विधानसभेवर दावा करणारे ए. वाय. पाटील यांची चांगलीच पिच्छेहाट झाली आहे. बिद्री साखर कारखान्यात माजी आ. के. पी. पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. यामुळे कारखाना आणि विधानसभेतून निवडणुकीतून ए. वाय. बाहेर फेकले असल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे.
बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांचे दाजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, बिद्रीचे माजी संचालक ए. वाय. पाटील यांनी वारंवार मला कारखाना किंवा विधानसभा उमेदवारी द्या असा हा पक्षश्रेष्ठींच्याकडे हट्ट धरला होता. दरवेळी त्यांची समजूत काढून कारखाना व विधानसभा निवडणुका पार पडल्या जात होत्या.
अनेक वेळा ए. वाय. पाटील यांनी बंड पुकारले मात्र ते बंड काही कालावधीत थंड झाले.यावेळी मात्र त्यांनी के.पी यांना कारखान्यातून बाहेर काढायचे असा चंग बांधला होता. प्रसंगी रक्ताचं नातं सोडून विरोधी आघाडीत सहभागी होणे त्यांनी पसंत केले. किमान कारखाना तरी मिळेल या उद्देशाने त्यांनी के.पी यांच्या विरोधात जोरात प्रचार केला.
मात्र या निवडणुकीत ए. वाय यांच्या पॅनलचा पराभव झाल्यामुळे ते कारखाना सह विधानसभा निवडणुकीतून सुद्धा बाहेर फेकले गेले असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणत भविष्यात काय तरी पदरात पडले असते अशी अपेक्षा होती मात्र या पराभवाने ए. वाय पाटील गट मात्र चांगलाच नाराज झालाय.
राष्ट्रवादी काँग्रेस मधून के.पी. यांनाच पसंती
राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर माजी आमदार के. पी. पाटील यांचा विधानसभेचा बायोडेटा आता भरभक्कम झाला आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांची सुद्धा साथ के.पी. पाटील यांनाच असणार आहे.