पावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावर
schedule08 May 26 person by visibility 13 categoryआरोग्य
स्थायी समितीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले
तावडे हॉटेल परिसरातील २४५ विनापरवाना दुकाने सील करण्याचे आदेश; 'आयआरबी'च्या गलथान कारभाराचा पंचनामा
कोल्हापूर |आवाज इंडिया प्रतिनिधी
पावसाळा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असताना नाले उपशाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणल्याबद्दल आज महापालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनाची मोठी कोंडी झाली. "डिसेंबरपासून प्रशासन झोपले होते का?" असा संतप्त सवाल करत सदस्यांनी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच तावडे हॉटेल परिसरातील विनापरवाना दुकानांवर तातडीने सील ठोकण्याचे आदेश सभापतींनी दिले.
मा. स्थायी समितीची बैठक आज पार पडली. यावेळी मान्सूनपूर्व तयारी आणि शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून सदस्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रशासनाचा 'पावसाळी' कारभार; सदस्यांचा संताप
नाल्यातील गाळ काढल्यानंतर तो काठावरच ठेवला जातो आणि पावसाने पुन्हा नाल्यात वाहून जातो, याकडे मा. प्रतापसिंह जाधव, मा. अमर समर्थ, मा. अर्चना पागर व सौ. प्रतिज्ञा उत्तुरे यांनी लक्ष वेधले. १५ दिवसांवर पाऊस असताना आता यंत्रणा भाड्याने घेण्याचे शहाणपण प्रशासनाला का सुचले? असा सवाल त्यांनी केला. यावर २० मार्चपासून काम सुरू असून नवीन निविदा मंजूर होताच ५० फुटी पोकलँडद्वारे गाळ उपसा पूर्ण करू, असे उत्तर प्रशासनाने दिले.
'आयआरबी'च्या कामाचा फटका; घरांत पाणी शिरणार
शहरातील मुख्य रस्त्यांवरील ड्रेनेज आणि चॅनेल कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरते, असा मुद्दा मा. सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, अभिजीत मोकाशी, सौ. पुर्वा राणे व अनुराधा खेडकर यांनी मांडला. आयआरबीने चॅनेलमध्ये ठेवलेले स्लॅबचे तुकडे काढले नसल्याने पाणी तुंबते. रंकाळा ते फुलेवाडी रस्त्यावरील उघड्या चेंबर्समुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर उपशहर अभियंत्यांनी पाहणी करून काँक्रिट फोडून चेंबर करण्याची ग्वाही दिली.
तावडे हॉटेल परिसरातील दुकाने सील करण्याचे आदेश
तावडे हॉटेल ते गांधीनगर दरम्यानच्या २९५ मिळकती आणि २४५ विनापरवाना व्यवसायिकांवरून सभेत मोठी खडाजंगी झाली. मा. इंद्रजीत बोंद्रे, आदिल फरास व प्रविण सोनवणे यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले की, "परवाना विभागाने आत्तापर्यंत कारवाई का केली नाही? यामुळे नगरसेवकांची नाहक बदनामी होत आहे." यावर सर्वोच्च न्यायालयाच्या अटीनुसार १५ दिवसांची नोटीस देऊन दुकाने सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देश सभापतींनी दिले.
- मा. आदिल फरास: "पापाची तिकटी येथील संभाजी महाराज पुतळा परिसरासाठी स्वतंत्र सुरक्षा व स्वच्छता एजन्सी नेमा. तिथे सीसीटीव्ही आणि रोषणाई करा."
- मा. अनुराधा खेडकर: "महापालिकेला मिळणाऱ्या ८ नवीन स्विपींग मशिनसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर घ्या, अन्यथा यंत्रसामग्री खराब होईल. तसेच अतिक्रमण काढलेल्या जागी पुन्हा फेरीवाले बसणार नाहीत याची दक्षता घ्या."
- मा. अर्चना पागर: "शहरातील ४९ किमीच्या मुख्य रस्त्यांची महिन्यातून किमान एकदा तरी यंत्राद्वारे सफाई झालीच पाहिजे."
- मा. प्रतापसिंह जाधव: "दुधाळी शुटिंग रेंज येथे रात्री अवैध धंदे चालतात, तिथे तातडीने स्वतंत्र सुरक्षा रक्षक (गार्ड) तैनात करा."
महत्त्वाचा निर्णय:
सीएसआर (CSR) फंडातून नागरी सुविधा केंद्रात केवळ एचडीएफसी बँकेमार्फत कर्मचारी घेण्याऐवजी इतर बँकांकडूनही प्रस्ताव मागवण्याचे आदेश सभेत देण्यात आले.