असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
"या मनातलं त्या मनाला अचूक कळतं असा हक्काचा कोपरा म्हणजे मैत्री...
काही गोष्टीच मोल करता येत नाही, त्यापैकी एक म्हणजे जीवाला जीव लावणारी मैत्री. ती कधी हसवून जाते तर कधी डोळ्यात अलगद अश्रू देऊन जाते. दोन मित्रांमधील अशाच यारी दोस्तीची कथा सांगणारा 'रूप नगर के चीते' हा मराठी चित्रपट १६ सप्टेंबरला प्रेक्षकाच्या भेटीला येतोय. मनाच्या आतमध्ये स्वतःशी युद्ध सुरु असताना आपण करतोय ते चूक की बरोबर याची शहानिशा करण्यासाठी आपल्या आत डोकावणारा मित्र लागतो . त्याचही म्हणणं ऐकणं गरजेच असतं, तुमच्या मित्राच्या मनातला आवाज तुम्ही कधी ऐकलाय का? याच टॅगलाइनवर आधारलेल्या या चित्रपटाची निर्मीती एस एटरटेन्मेंट बॅनरखाली निर्माते मनन शाह यांनी केली असून दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांचे आहे.
अखिल आणि गिरीश या दोन जीवलग मित्रांच्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. त्यांच्यातला दुरावा मिटणार की वाढणार? याची नक्कीच उत्सुकता लागणार आहे. यासोबतच मैत्रीचे धागे जाणीवपूर्वक जपणे कसे महत्त्वाचे असतात हे सांगू पाहणारा हा चित्रपट आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर , आयुषी भावे,सना प्रभू, तन्वीका परळीकर, ओंकार भोजने, रजत कपूर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.
अनेक जाहिराती, म्युझिक अल्बम, प्रिंट शूट मध्ये करण परब झळकला आहे तर कुणाल शुक्ल याने नाटयक्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. मुग्धा चाफेकर, हेमल इंगळे आयुषी भावे आणि सना प्रभू या चौघींनीही मनोरंजन विश्वासोबतच सौंदर्यस्पर्धामध्येही आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटातही त्यांचा वेगळा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.चित्रीकरणासाठी बराच कालावधी घेऊन चित्रपट अतिशय सुंदर बनवला गेला आहे.
खरी मैत्री म्हणजे आनंदाचा ठेवाच. पण या जिगरी दोस्तीत कधीकधी अनबनही होते. रूप नगर के चीते या
चित्रपटातून आम्ही हा विषय रंजकपणे मांडला आहे. मैत्री हा दोन अक्षरी शब्द ,पण तो जपण्यासाठी माणसाला
जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, हे दाखवणारा हा चित्रपट असल्याचे दिग्दर्शक विहान सूर्यवंशी सांगतात.
"रूप नगर के चीते "या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे. गीते जय अत्रे यांची आहेत. सुप्रसिद्ध मल्याळम संगीतकार शान शान रहमान आणि मनन शाह यांनी संगीत तर पार्श्वसंगीताची जबाबदारी मुजीब माजीद यांनी सांभाळली आहे.सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी आवाज दिला आहे. निर्मिती प्रमुख मालविका शाह आहेत. महावीर सबनवार यांनी साऊंड डिझायनिंगची तर प्रशांत बिडकर यांनी प्रोडक्शन डिझायनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. वेशभूषा विहान सूर्यवंशी, सागर त्रिलोतकर यांची असून रंगभूषा महेश बराटे यांची आहे. नृत्यदिग्दर्शन स्टेनली डी कोस्टा, विहान सूर्यवंशी, संतोष रेड्डी यांचे आहे. रोहन मापुस्कर चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत.