घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत, ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
schedule06 May 26 person by visibility 19 categoryगुन्हे
कोल्हापूर, (आवाज इंडिया): जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव व करवीर परिसरात सुरू असलेल्या चोरी व घरफोडीच्या मालिकेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ८ लाख ५० हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुनीता उर्फ बारकी दगडू गोसावी (वय ३७), नानुबाई राजू गोसावी (वय ५०) यांच्यासह रिक्षाचालक अण्णासाहेब रुघप्पा चौगुले (वय ४६) व संजय सोमा सरवदे (वय ४१) यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाह, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व अतिष म्हेत्रे यांनी पथक तयार करून तपास सुरू केला होता. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून मोटर केबल, मोटर पंप, व्हायब्रेटर, अॅल्युमिनियम जॉब, सॅनिटरी साहित्य असा विविध प्रकारचा चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपींनी गोकुळ शिरगाव व करवीर पोलीस ठाणे हद्दीत एकूण ६ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
या कारवाईत प्रवीण पाटील, अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, संदीप पाटील, विनायक चौगुले, नवनाथ कदम, संजय हुंबे, अनिल जाधव, संजय पाडवळ, अरविंद पाटील, महेश आंबी आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या टोळीमागील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.