खा. डॉ. अमोल कोल्हे; महाविकास आघाडीच्या उभा मारूती चौकातील सभेला प्रचंड गर्दी
कोल्हापूर : प्रतिनिधी
धर्माच्या नावावर राजकारण यशस्वी होणार नाही, हे शाहू महाराजांना विजयी करून पुरोगामी कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करावे, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील उभा मारूती चौकात आयोजित केलेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
राज्यात होऊ घातलेले फॉक्सकॉनसह चार ते पाच प्रकल्प गुजरातने पळवले, कांदा निर्यात बंदी आणि तत्कालिन राज्यपाल व भाजपच्या बड्या नेत्यांकडून सातत्याने झालेला राष्ट्रपुरूषांचा अवमान अशा घटनांनी महाराष्ट्राला घायाळ केले जात असताना महायुतीचे 39 खासदार दिल्लीश्वरांपुढे खाली माना घालून मौन का बाळगून होते. सत्तेची सूत्रे हातातून जात असल्याची स्पष्ट जाणीव होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना आपला पवित्रा, रोख बदलावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी कोल्हापुरात तळ ठोकावा लागतो आहे. प्रत्येक मतदारसंघात त्यांना सभा घ्यावी लागते आहे, गल्लीबोळात फिरावे लागते आहे. हा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. देशाच्या पंतप्रधानपदावर असणार्या मोदींना गेल्या दहा वर्षात एकही पत्रकार बैठक घ्यावीशी वाटली नाही. पण सत्तेची सूत्रे हातातून निसटत असल्याची चिन्हे दिसताच तब्बल पाच प्रसारमाध्यमांच्या संपादकाना निमंत्रित करून माध्यमांशी बोलायची परिस्थिती त्यांच्यावर आली. इथेच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा या लोकसभा निवडणुकीतील विजय निश्चित झाला आहे. देशातील एकंदर परिस्थितीवर आता ‘हाथ बदलेगा हालात’ हे सूत्र यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करून डॉ. कोल्हे यांनी कोल्हापुरात शाहू छत्रपती विक्रमी मतानी विजयी होऊन दिल्लीत जातील, यात आता कोणतीही शंका राहिलेली नाही, असे स्पष्ट केले.
मंडलिक यांचा निष्क्रिय खासदार असा उल्लेख करत खासदार संजय मंडलिक स्वतःला शिवाजी पेठेतले म्हणवतात, ते पाच वर्षात किती वेळा शिवाजी पेठेत आले, असा सवाल डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला. काँग्रेसच्या मजबूत हातात पेटलेली मशाल विजयाची तुतारी वाजवत केंद्रातील भाजपा सरकारला निरोपाचा नारळ देईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच येत्या 7 मे रोजी चुकाल तर महाराष्ट्राचे भवितव्य अंधारात जाईल, अशी भीती व्यक्त करत मतदानाचा हक्क बजावायला जाताना घरातील गॅस सिलेंडरचे दर्शन घ्या, घरातील लहान मुले, नातवंडे आणि तरूण बेरोजगार मुलांचे चेहरे पाहून मतदान करण्यासाठी बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या सभेत बोलताना उमेदवार शाहू छत्रपती यांनी अत्यंत पोषक वातावरण असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे सांगून नागरिकांनी निर्भय होऊन मतदान करावे आणि महाविकास तसेच इंडिया आघाडीस विजयी करण्याचे आवाहन केले.
मालोजीराजे छत्रपतीनी खासदार मंडलिक यांचे कोल्हापूरसाठी शून्य योगदान असल्याचे सांगून त्यांना पराभूत करण्याचे आवाहन केले.
या सभेत विविध संघटनांनी शाहू महाराजांना जाहीर पाठींबा देत तशा आशयाची पत्रे मालोजीराजे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार, कॉ. चंद्रकांत यादव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चंद्रकांत सूयवंशी, दत्ता टिपूगडे, लालासाहेब गायकवाड, माजी उपमहापौर विक्रम जरग यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन रवींद्र साळोखे यांनी केले तर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
यावेळी आमदार श्रीमती जयश्री जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवी इंगवले, माजी महापौर सई खराडे, शोभा बोंद्रे, माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडी शहर अध्यक्षा पद्मा तिवले, अजित खराडे, कॉ. बाबुराव कदम, माजी नगरसेवक चंद्रकांत साळोखे, ईश्वर परमार, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना संघटक मंजित माने, आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, कॉ. दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, शिवाजीराव परूळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.