भाजपचे मनसुबे हाणून पाडणार; 'डीपीआय' उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणार
schedule16 May 26 person by visibility 10 categoryशैक्षणिक
कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीत 'डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया'चा निर्णय
कोल्हापूर, आवाज इंडिया प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती वर्गाचे उपवर्गीकरण करण्याच्या शासनाच्या हालचालींमुळे सध्या महाराष्ट्रात अस्वस्थतेचे वातावरण आहे. काही घटक या निर्णयाच्या बाजूने तर काही विरोधात आवाज उठवत आहेत. मात्र, भाजप या संवेदनशील निर्णयाकडे निव्वळ राजकीय फायदा म्हणून पाहत असून, स्वतःच्या पक्षातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधील मोठा वर्ग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे हे राजकीय मनसुबे हाणून पाडण्यासाठी आणि हा लढा त्यांच्या हातात जाऊ न देण्यासाठी 'डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया' (डीपीआय) स्वतः या उपवर्गीकरण चळवळीचे नेतृत्व करणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाच्या राज्यस्तरीय चिंतन बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे सर यांनी आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी या आंदोलनाची अधिकृत घोषणा केली. यावेळी पक्षाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे प्रामुख्याने उपस्थित होते.
शाहू महाराजांच्या विचारांचा आधार
याबाबत अधिक माहिती देताना प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा मागोवा घेतल्यास, उपवर्गीकरण झाल्यास ज्या जातींना अजूनही आरक्षणाचा फायदा घेता आलेला नाही, त्यांना निश्चितपणे लाभ मिळू शकतो. शाहू महाराजांनी सुरुवातीला बहुजनांच्या मुलांना एकाच वसतिगृहात प्रवेश दिला होता. परंतु, विशिष्ट जातीच्या लोकांनीच त्याचा अधिक फायदा घेतल्याचे आणि पिचलेल्या, व्यवस्थेने नाकारलेल्या समाजाला एकत्र प्रवेश दिल्यामुळे पुरेसा फायदा होत नसल्याचे महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतर महाराजांनी क्रांतीकारी निर्णय घेत वेगवेगळ्या २1 जाती-धर्मांसाठी मिस क्लार्क बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, मराठा बोर्डिंग अशी २१ स्वतंत्र वसतिगृहे निर्माण केली. त्यामुळेच खऱ्या अर्थाने बहुजनांना शिक्षणाचा फायदा घेता आला.
५९ पैकी अनेक जाती आरक्षणापासून वंचित
त्याच धर्तीवर, अनुसूचित जातीमध्ये तब्बल ५९ जातींचा समावेश आहे. परंतु, गेली ७५ वर्षे केवळ काही विशिष्ट जातींनीच या आरक्षणाचा मुख्यत्वे फायदा घेतला आहे. परिणामी, ५९ जातींपैकी इतर अनेक जातींना अजून १ टक्केही आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. यामध्ये होलार, रामोशी, मांग, गारोडी, डक्कलवार अशा अनेक जाती आरक्षणाच्या फायद्यापासून पूर्णपणे वंचित राहिल्या आहेत. म्हणूनच, या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा लढा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्रात स्वतःच्या हिंमतीवर लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कोल्हापूर येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय चिंतन बैठकीला पक्षाचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे, राज्य प्रवक्ते सुभाष लोनके, सांगली जिल्हाध्यक्ष दादासाहेब कस्तुरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विलास लोंढे, सातारा जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सोलापूर जिल्हाध्यक्ष अंबादास वायदंडे, पृथ्वी मोरे, पुणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ लोनके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे नेटके नियोजन लालासाहेब नाईक यांनी केले.