+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ?
schedule27 Apr 24 person by visibility 79 category

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी नितीन बानुगडे पाटील यांच्या कोल्हापुरात ठिकठिकाणी सभा झाल्या.

कोल्हापूर : प्रतिनिधी 
शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्‍तीच्या शिक्षणाचा कायदा केला. मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षण दिले. आता मोदींची गॅरंटी सांगणार्‍या भाजप सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करायचा निर्णय घेतला आहे. 62000 शाळांच्या खासगीकरणाचा डाव आखला आहे. 14,573 शाळा समूहशाळेच्या नावाखाली बंद करण्यात येत आहे. मग सर्वसामान्य मुलांनी शिकायचे कुठे? मोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही, अशा शब्दात नितीन बानुगडे-पाटील यांनी भाजपच्या कारभारावर तोफ डागली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी नितीन बानुगडे पाटील यांच्या कोल्हापुरात राजारामपुरी राजारामपुरी सभा झाली . या सभांना नागरिकांची तुडूंब गर्दी झाली होती. राजारामपुरी येथील मारूती मंदिराजवळ झालेल्या सभेत बोलताना नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, यंदाची निवडणूक म्हणजे स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. भाजपच्या राजवटीत संविधान, लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही वाचली पाहिजे आणि संविधान टिकले पाहिजे म्हणून शाहू छत्रपती यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
गेल्या दहा वर्षांमध्ये दिल्‍लीतील मोदी सरकारने देशाची दुदर्शा केली आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली त्या राज्याला खिळखिळे केले जात आहे. भारतीय जनता पक्षाला वन नेशन-वन पार्टी राबवायचे आहे. यामुळे ते विरोधी पक्षाला संपवत आहेत. या निवडणुकीत भाजपला पराभूत केले नाही तर ही 2024 ची निवडणूक अखेरची ठरेल. म्हणून राष्ट्र वाचविण्यासाठी महाराष्ट्राला उभे राहावे लागेल. तेंव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे लागेल अशी हाक शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी कोल्हापूरकरांना दिली.
गेल्या दहा वर्षातील भाजप सरकारच्या कारभाराचा पंचनामा करताना बानुगडे-पाटील म्हणाले, 2014 मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने लोकांना दिलेले आश्‍वासने आठवा. परदेशातील काळा पैसा भारतात आणणार, सर्वसामान्यांच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करणार, शेतकर्‍यांचे उत्पन्‍न वाढविणार अशा नानाविध घोषणा केल्या होत्या. मात्र दहा वर्षात भाजप सरकारने एकही आश्‍वासन पाळले नाही. उलट शेतकर्‍यांची लूट केली. शेती उत्पादनावर 18 टक्के जीएसटी लावली. जीएसटीच्या माध्यमातून एक लाखाच्या खरेदीवर 18 हजार रूपये शेतकर्‍यांकडून ओरबडायचे आणि किसान सन्मान निधी म्हणून सहा हजार रूपये जमा करायचे हा कुठला प्रकार? सध्या देशातील 46 कोटी लोकसंख्या ही 18 वर्षाच्या आतील आहे. या मुलांच्या भवितव्याशी हे सरकार खेळत आहे. युवकांना योग्य शिक्षण नाही, रोजगार नाही, हाताला काम नाही, कष्टाला दाम नाही अशी भयाण स्थिती आज देशभरात निर्माण झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालावधीतील शासन म्हणजे महाराष्ट्राचा सुवर्णकाळ होता. कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला सुरक्षित ठेवले. 80 हजार कोटीची गुंतवणूक राज्यात झाली. विना अट शेतकर्‍यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजप सरकारने कुटील पद्धतीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला केले. भाजपने गद्दारांना हाताशी धरून महाराष्ट्रात सत्ताबदल केला, पण उद्धव ठाकरे यांना जनतेच्या मनातून कसे उतरवणार? असा सवाल बानुगडे-पाटील यांनी केला. 
भाजपने राज्यांमध्ये जे फोडाफोडीचे राजकारण केले त्याविषयी लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ही निवडणूक म्हणजे गद्दारी विरूद्ध निष्ठावंत अशी आहे. तसेच भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी आहे आणि ही लढाई नक्‍कीच देशभरातील जनता जिंकणार आहे. इंडिया आघाडी, महाविकास आघाडीचे उमेदवारांना विजयी करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.
आमदार श्रीमती जयश्री जाधव म्हणाले, भाजप सरकारच्या राजवटीत नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. महागाईमुळे महिला त्रस्त आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप फोडाफोडीचे राजकारण करत आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये दिल्‍ली दरबारी शाहू छत्रपती यांच्यासारखा सक्षम लोकप्रतिनिधी हवा. 
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत आहे. कोल्हापुरातील जनता शाहू छत्रपतींच्या पाठीशी आहे. ते नक्‍कीच विजय होतील.
याप्रसंगी का. दिलीप पवार, माजी नगरसेवक अनिल कदम, शेकापचे बाबुराव कदम, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांची भाषणे झाली. बहुतांश नेत्यांनी महायुतीचे खासदार संजय मंडलिक व त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांचा चांगलाच समाचार घेतला. सभेला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक संजय मोहिते, काकासाहेब पाटील, शिवाजी कवाळे, काँग्रेसच्या कार्यकर्त्या सरलाताई पाटील, संध्या घोटणे, शेखर घोटणे, रघुनाथ टिपुगडे, महेश उत्तुरे, उमेश पोवार, विशाल देवकुळे, मनजित माने, कमलाकर जगदाळे, बाबा इंदुलकर, अनुप पाटील, अमित कदम, दुर्गेश लिंगरस, काका जाधव, बापू जाधव आदी उपस्थित होते.