तोरस्कर सरांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणले - खा. धनंजय महाडिक
schedule25 May 25 person by visibility 17 categoryशैक्षणिक

कोल्हापूर ;
समाजामध्ये चांगला समाज घडवण्याचे काम शिक्षकच करतात आणि हे काम करत असताना त्यांच्या कामाचे मूल्यमापन त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात केले जाते. तोरस्कर सरांनी आपल्या जीवनात शिक्षक म्हणून सेवा करत असताना आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या व शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी शिक्षण संस्था श्री शाहू सह दूध संस्था राजा शिवछत्रपती वाचनालय, पाणीपुरवठा संस्था ही स्वतः काढून त्या आदर्शवत चालवल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यापुढे त्यांनी सेवानिवृत्त न होता आपल्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग समाजासाठी करावा असे प्रतिपादन खा. धनंजय महाडिक यांनी केले. ते नागांव ता करवीर येथील माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक व मुख्याध्यापक श्री रंगराव तोरस्कर यांच्या सेवा गौरव समारंभामध्ये अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत होते.
यावेळी शाहू ग्रुप कागल चे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी श्री रंगराव तोरस्कर यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हणाले की , श्री.तोरस्कर सर यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील काम खूप कौतुकास्पद आहे. नागाव सारख्या छोट्या गावात स्वतंत्र संस्था काढून ती नावारूपास आणली आणि आज विद्यालयाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चमकत आहेत याचे सर्व श्रेय श्री रंगराव तोरस्कर यांनाच जाते.
माजी आमदार श्री संपतराव पवार पाटील, माजी शिक्षक आमदार श्री भगवानराव साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून श्री रंगराव तोरस्कर यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी श्री रंगराव तोरस्कर यांच्या कार्यावर आधारित ' रंगोत्सव ' हा गौरव अंक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
यावेळी कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, शाहू साखरचे व्हा. चेअरमन श्री अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे माजी चेअरमन श्री एम पी पाटील ,शाहू साखरच्या संचालिका सौ.सुजाता तोरस्कर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री नाथाजी पाटील , श्री बी जी बोराडे , श्री डी एस घुगरे , श्री आर वाय पाटील , श्री बी बी पाटील , श्री अभिषेक बोंद्रे , श्री जयसिंग पवार , मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक , श्री टी एम पवार , श्री आर डी पाटील , सौ सविता पाटील , तसेच , सेवा गौरव समितीचे सदस्य , शिक्षक , सेवकवर्ग , आजी-माजी विद्यार्थी - विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक श्री अरविंद मगदूम यांनी केले. आभार श्री डी एस पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे निवेदन कु. स्वप्नाली तोरस्कर व अजय पोर्लेकर यांनी केले.