*
राजाराम कारखान्याकडून ऊस तोड वेळेत दिली जात नसल्याचा आरोप करत काही लोकांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. या आरोपाचे खंडन करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषद घेतली.
आज पोटनियम बदलाच्या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीवर अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्यासाठी आजचा मुहूर्त साधून राजकीय भावनेतून प्रेरित असा हा मोर्चा काढण्यात आला, असे मत राजाराम कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी मांडले.
तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन, अवकाळी पडलेला पाऊस, मराठा आंदोलन अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे तोडणी वेळापत्रक बिघडले आहे. पण केवळ राजाराम कारखान्याबद्दल वाटणाऱ्या मत्सरातून हा मोर्चा विरोधकांनी काढला. पण त्याला शेतकरी सभासदांचा थंडा प्रतिसाद मिळाला.
त्यांच्या मोर्चात शेतकरी कमी आणि कार्यकर्तेच जास्त होते अशी टीका अमल महाडिक यांनी केली. कारखान्याची एकूण 15000 सभासद संख्या आहे. यापैकी फक्त 150 लोक मोर्चाला उपस्थित होते. त्यातही 25 भर सभासद वगळता इतर सर्व कार्यकर्तेच सामील असल्याचे सांगून, मूळ सभासदांचा कारखाना प्रशासनावर पूर्ण विश्वास असल्याचे महाडिक यांनी नमूद केले.
उपस्थित असलेल्या 20-25 सभासदांपैकीही बऱ्याच लोकांचा ऊस कारखान्याने नेला आहे. संदीप नेजदार यांच्या नावासह उदाहरण देत विरोधकांपैकी अश्या बऱ्याच लोकांच्या खात्यावर पैसेही जमा झाल्याचा खुलासा अमल महाडिक यांनी केला.
केवळ राजाराम कारखान्याच्या बदनामीच्या हेतूने स्टंटबाजी करून कोणी प्रशासनास व्हयचीस धरण्याचा प्रयय्न करत असेल तर जशास तसे उत्तर देण्यास आपण समर्थ असून, वेळप्रसंगी सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने जिथे खासगीकरण झाले आहे त्या डी.वाय. कारखान्यावर आपणही मोर्चा काढू, असा इशारा महाडिक यांनी दिला.
या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना महाडिक यांनी उत्तरे दिली. कोल्हापूर दक्षिण विधानसभेची निवडणूक अजून लांब आहे त्याआधी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्ष सज्ज झाले आहेत. असेही यावेळी महाडिक यांनी नमूद केले. महायुतीतील तीनही पक्ष एकमताने कार्यरत असून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहर आणि परिसरातील विविध विकासकामांसाठी भरघोस निधी मिळाला आहे या निधी वाटपावरून पत्रकारांनी विचारले असता सर्वांना व्यवस्थित निधीचे वितरण केले जात आहे असा खुलासा महाडिक यांनी केला.
सतेज पाटील नेतृत्व करत असलेल्या कारखान्यामध्ये काय परिस्थिती आहे हे मी यापूर्वीही सांगितले आहे पण त्यावर त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही याकडे अमल महाडिक यांनी लक्ष वेधले.
लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची त्यांची सवय आता सर्वांना ठाऊक झाली आहे त्यामुळे कुणीही त्यांचे बोलणे मनावर घेत नाही असा टोला महाडिक यांनी लगावला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निधीतून होणारी कामे श्रेय लाटण्यासाठी स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोपही महाडिक यांनी केला. या पत्रकार परिषदेला राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, संतोष पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.