प्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालय उभारणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर*
schedule14 May 26 person by visibility 13 categoryराजकीय
*कामगार विमा योजनेत महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळविण्यासाठी कटिबद्ध व्हावे*
कोल्हापूर : आवाज इंडिया प्रतिनिधी
कामगार हा राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा कणा आहे. त्यामुळे त्याच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने अधिक सक्षमपणे उचलली पाहिजे. कामगार राज्य विमा योजना (ESIC) ही केवळ आरोग्य सुविधा नसून कामगारांच्या सुरक्षित भविष्यासाठीची मजबूत हमी आहे. महाराष्ट्राला या योजनेत देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये काम करावे,” असे स्पष्ट निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजना रुग्णालय सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ईएसआयसीची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि लाखो कामगारांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते.
बैठकीत आरोग्य मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, राज्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत असतानाही अनेक पात्र कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत योजनेचे लाभ पूर्ण क्षमतेने पोहोचत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी तातडीने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी. औद्योगिक वसाहती, कारखाने, कंपन्या आणि विविध आस्थापनांमध्ये विशेष कार्यशाळा घेऊन कामगारांना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा, उपचार, विमा संरक्षण आणि आर्थिक मदतीची सविस्तर माहिती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमधील सुमारे ४९ लाख कर्मचारी ईएसआयसी योजनेसाठी पात्र असून, त्यांच्या कुटुंबीयांसह जवळपास दोन कोटी नागरिक या योजनेच्या कक्षेत येतात. म्हणजेच राज्यातील जवळपास २० टक्के लोकसंख्येला या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. त्यामुळे ही योजना अधिक मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सध्या राज्यात कामगार विमा योजनेची १५ रुग्णालये कार्यरत आहेत. मात्र वाढती औद्योगिक लोकसंख्या लक्षात घेता आणखी १८ ठिकाणी नवीन रुग्णालयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यासोबतच मुंबईतील अंधेरी, पुण्यातील बिबवेवाडी आणि नागपूर येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या निर्णयामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अधिक दर्जेदार आणि तातडीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
बैठकीत प्रशासनाला अधिक परिणामकारक कामगिरी करण्याचे निर्देश देताना आरोग्य मंत्री आबिटकर यांनी, “कामगारांना योजनांचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येता कामा नये. योजनांची माहिती प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. महाराष्ट्राने कामगार कल्याणाच्या बाबतीत देशात आदर्श निर्माण केला पाहिजे,” असे ठामपणे सांगितले.
या बैठकीस कामगार आयुक्त एच. पी. तुंमोड, अभिलाषा झा, भारतीय मजदूर संघाचे अनिल डोमणे, राज्य कामगार विमा योजना विभाग, कामगार मंत्रालय तसेच भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यशाळा घ्या....
योजनेची सविस्तर माहिती प्रत्येक कामगारांपर्यंत पोहोचावी यासाठी अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहती, विविध आस्थापने आणि कारखान्यांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करावे. या माध्यमातून कामगारांना योजनेचे लाभ, सुविधा आणि उपचार पद्धतींबाबत जागरूक करावे. तसेच योजनेची व्यापक प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.