कलाकारांच्या मानधनाची बैठक त्वरित घ्या; जिल्हा परिषद अध्यक्षांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
schedule07 May 26 person by visibility 26 categoryसामाजिक
आवाज इंडिया
कोल्हापूर (प्रतिनिधी):
महाराष्ट्र शासनाच्या 'राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजने'ची जिल्हास्तरीय निवड समितीची बैठक गेल्या दोन वर्षांपासून झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेकडो वयोवृद्ध कलाकार मानधनापासून वंचित असून, त्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी लगतच्या आठवड्यात ही बैठक आयोजित करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात अध्यक्षांनी नमूद केले आहे की, कोल्हापूर जिल्हा हा कलाकार, साहित्यिक, शाहीर आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा जपणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील कलाकारांना न्याय देण्यासाठी शासन ही मानधन योजना राबवते. मात्र, जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी असूनही गेल्या दोन वर्षांपासून या समितीची बैठक झालेली नाही.
अर्जांचा डोंगर कायम
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ६७७ अर्ज प्राप्त झाले होते, त्यापैकी ३९७ अर्ज पात्र ठरले आहेत. तसेच, सन २०२५-२६ या वर्षासाठी आतापर्यंत ११०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी ५० वर्षांवरील कलाकार पात्र असतात.
वयोवृद्ध कलाकारांची पायपीट
मानधनासाठी अर्ज केलेले कलाकार हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आपल्या अर्जाचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी या वयोवृद्ध कलाकारांना ग्रामीण भागातून वारंवार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. ही हेळसांड थांबवण्यासाठी आणि कलाकारांना दिलासा देण्यासाठी तातडीने बैठक घेऊन प्रलंबित विषय मार्गी लावावेत, अशी आग्रही विनंती सौ. शिल्पा खोत यांनी केली आहे.