महापूर आणि घ्यावयाची काळजी:
schedule17 Jun 21 person by visibility 838 categoryसामाजिक

डॉ.युवराज मोटे (कोल्हापूर) : या वर्षी मान्सूनची सुरूवातच 'तोक्ते' आणि 'यास' या चक्रीवादळाच्या निर्मितीनंतर झाली. केरळमध्ये मान्सूनचे आगमन दोन दिवस उशिरा म्हणजे 3 जून 2021 रोजी झाले. त्यानंतर अगदी दोन दिवसांमध्येच मान्सून महाराष्ट्रात अर्थात कोकणात दाखल झाला. आणि सध्या देशभरात मोठ्या जोमाने मान्सून सक्रिय झालेला दिसून येतो.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार यावर्षी भारतीय उपखंडामध्ये 101 टक्के पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अनुमानानुसार देशभरात पाऊस चांगला असणार आहे. त्यामुळे दुष्काळी स्थिती फारशी दिसणार नाही. नैसर्गिक पर्यावरणातील बदल हे दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडच्या काळात देशभरात महापूराच्या घटना वाढताना दिसत आहेत. जास्त पावसामुळे नद्यांना पूर येतो.
नद्या, नाले, सरोवरे, सागर इत्यादीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊन सभोवतालचा प्रदेश हा जलमय होतो त्यास पूर आला असे म्हणतात. भारतामध्ये ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, कोसी, गंडक, दामोदर, कृष्णा, महानदी, सुवर्णरेखा, गोदावरी, कावेरी, नर्मदा, इत्यादी नद्यांना पूर येतो. या पुरामुळे मोठ्या प्रमाणात भोवतालचे नुकसान होते. गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात झालेल्या बदलामुळे मानवी जीवनावर दुरगामी परिणाम होताना दिसत आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत होते.
सन 2005 साली कोल्हापूर, सांगली, मुंबई येथे आलेला महापूर, तसेच केदारनाथ,आसाम, बिहार मधील महापूरामुळे निसर्गाचा प्रलय दिसत आहे. त्यामुळे अनेक लोक, पशू -पक्षी मृत्युमुखी पडतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान होते. मानवी जीवनावर परिणाम पडतो व त्याची किंमत मोजावी लागते. या सगळ्या घटकांचा व परिणामाचा विचार करता महापूर निसर्गनिर्मितआहे की मानवनिर्मित? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो. मुसळधार अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर येतो. महापूराची मीमांसा करताना असे लक्षात येते की नैसर्गिक पर्यावरणामध्ये मानवाने केलेला बदल कारणीभूत आहे. उदा. नदीपात्रामध्ये केलेले अतिक्रमणे, अवैध बांधकाम, धरण क्षेत्रांमधील वृक्षतोड, नदीपात्रामध्ये उभारलेले अडथळे, धरणांमधील पाण्याच्या नियोजनाचा अभाव, ओढे, नाले, नदी पात्रांमधील गाळ व प्लास्टिक, नदी परिसरातील जमीनीचे समतलीकरण, नदीकाठावरचे शहरीकरण, रस्ते बांधकाम आदी कारणामुळे महापूर स्थिती निर्माण होत आहे.
पाऊस सुरू झाला की कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये महापूराची चर्चा होते. धरणांमधील पाण्याची क्षमता, अलमट्टी धरणाची क्षमता, कृष्णा-पंचगंगा नद्यांतील पाण्याची स्थिती व दोन्ही प्रमुख नद्यांना महापूर हे चित्र अलिकडे दिसून येत आहे. त्याचा परिणाम नदीकाठावरील प्रदेशांना होतो. त्यामुळे महापूर का येतो? त्याची कारणे काय आहेत ? महापूराचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करता येईल? यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. पावसाच्या अंदाजाची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळाली तर होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल.
नैसर्गिक आपत्तीचा मानवी जीवनावर नेहमी प्रभाव दिसून येतो. दुष्काळ, महापूर, जंगलांना लागणारे वणवे या नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात अलीकडच्या काळात अनेक संकटे निर्माण होत आहेत. पावसाळा सुरू झाला की विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली परिसरामध्ये महापूर येतो. त्यामुळे मानवी जनजीवन विस्कळीत होते. वेळेमध्ये दक्षता घेतली तर जे नुकसान होणार आहे ते टाळण्यास मदत होईल. ज्या प्रदेशांमध्ये महापुराची स्थिती निर्माण होते त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसाची आकडेवारी पाहणे गरजेचे आहे. नदी धरण क्षेत्रांमधील पावसाची नोंद व धरणांमधील पाण्याची पातळी , पाण्याचा साठा, पाण्याचा वेळेत विसर्ग आधी बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले तर महापूरामुळे होणारे नुकसान टाळता येईल.
लोकांचे स्थलांतर वेळेत करणे गरजेचे आहे. नदी काठावरील गावे व महापूर रेडझोन घोषित केलेल्या भागातील लोकांना प्रशासकीय पातळीवर सूचना देऊन स्थलांतर करणे आवश्यक आहे. पुरग्रस्त लोकांना अन्न, वस्त्र, निवारा व औषधे उपलब्ध करणे गरजेचे आहे. नदी काठावरील गावांना अत्याधूनिक बोटी पुरवणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभा करुन महापुराचा सामना करण्याचे प्रशिक्षणही लोकांना देणे आवश्यक आहे. महापुरामुळे शेतीचे व पिकांचे, घरांचे, मालमत्तेचे नुकसान होते ते आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये टाळता येईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.