
असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
हुपरी : इचलकरंजी दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या हुपरी येथील जमिनीच्या खटल्याचा निकाल अखेर चर्मकार समाजाच्या बाजूने लागला आहे. अशी माहिती जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजर्षी शाहू महाराज, इंदुमती राणी सरकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील12 बलुतेदार यांना जमिनी वाटप केल्या असून त्या जमिनी समाजातील समस्त पुढारी यांच्या नावे पंच म्हणून 1948 साली वाटप केल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या कार्यकाळात त्यांच्याकडून जीआर मिळवून जिल्ह्यातील जमिनी बारा बलुतेदार, भूमीहीन शेतकरी लोकांना सातबारा करून देण्याचा निर्णय झाला.
याप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील गट नं. 925 /8 अ जमीन चर्मकार समाजास वाटप केली होती. परंतु समाजाचा पुढारी शिरोळे याने ही जमीन आपल्या नावे असल्याचे भासवून शासनाची व न्यायालयाची दिशाभूल केली. सदर जमिनीची तक्रार चर्मकार समाजाने पुणे आयुक्तांकडे दिल्यानंतर आयुक्तांनी फेर चौकशीचे आदेश दिले. चौकशीअंती त्यातून निष्पन्न झालेल्या पुराव्यातून हा निकाल न्यायालयात चर्मकार समाजाच्या बाजूने लागला आहे ,असे यावेळी कांबळे म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष शंकर कांबळे, महिला अध्यक्ष पूजा कदम, चर्मकार समाजाचे अध्यक्ष सुभाष टोणपे आदी उपस्थित होते.