संभाजीराजे यांचे आवाहन
शाहू छत्रपतींना मत म्हणजे राजर्षि शाहू महाराजांच्या ऋणातून उतराई होण्याची संधी
अभिजित तायशेटे
कोल्हापूर :
जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांना लोकसभेत पाठवणे ही गरज आहे त्यामुळे आता राधानगरी तालुक्यातील जनतेने ही जबाबदारी पार पाडावी असे आवाहन माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी केले. दरम्यान,
राजर्षि शाहू महाराजांच्या दूरदृष्टीच्या धोरणामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांती आणि धवलक्रांती झालेली असून छत्रपती घराण्याच्या ऋणातून उतराई होण्याची संधी म्हणून शाहू छत्रपती महाराजांना मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवूया, असे आवाहन गोकुळचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजीत तायशेटे यांनी केले.
गुडाळ( ता. राधानगरी ) येथे महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक महादेव कोथळकर होते. तर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "शाहू छत्रपतींना नेहमीच सर्वसामान्यांच्यात मिसळण्याची आवड असून खासदार म्हणून ते जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला नक्की न्याय देतील. गावा - गावांत सर्वपक्षीय मंडळी उत्स्फूर्तपणे त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात व तितक्याच उत्साहात पाठिंबा देत आहेत ही आमच्या छत्रपती घराण्यावरील जनतेच्या प्रेमाची साक्ष असून आमच्यासाठी ही निश्चितपणे अभिमानास्पद अशी बाब आहे."
या बैठकीसाठी 'भोगावती'चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, 'राष्ट्रवादी'चे बी.के.डोंगळे, गोकुळचे संचालक आर. के.मोरे, माजी महापौर मधुकर रामाणे,गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक ए.डी. पाटील, 'भोगावती'चे संचालक अभिजीत पाटील,रवींद्र पाटील, सागर धुंदरे,सुशील पाटील- कौलवकर, उभाठा शिवसेनेचे नेते सुरेश चौगले,पांडुरंग भांदिगरे,बाबा पाटील, संजय कांबळे आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयसिंह मोहिते यांनी स्वागत केले. माजी उपसरपंच प्रकाश मोहिते यांनी आभार मानले.
.....
तायशेटे हे छत्रपती घराण्यावरील श्रध्देपोटी शाहू महाराजांसोबत
विरोधी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक व आमदार प्रकाश आबिटकर यांचे निकटचे सहकारी असलेले व जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती पद भूषवलेले 'गोकुळ'चे विद्यमान संचालक अभिजीत तायशेटे यांनी थेट महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारात अगदी पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली असून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यावर केलेले अनंत उपकार आणि आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात छत्रपती घराण्याने वेळोवेळी दिलेले पाठबळ यामुळेच ते शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारात आघाडीवर असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.