रोहित पवार यांचे आवाहन
कोल्हापूर: देशातील शेतकऱ्यांना आणि तरुणांना भाजपने देशोधडीला लावले आणि आत्महत्या करण्यास भाग पाडले असा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. पाटील यांनी केले. दरम्यान, पाच वर्षे निष्क्रिय राहिलेल्या खासदाराचा करेक्ट कारण करा असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
महाविकास आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ पापाची तिकटी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते .
यावेळी रोहित पाटील म्हणाले की, कोल्हापूर ही स्वाभिमानी अस्मिता जपणारी भूमी आहे. या भूमीत राजर्षी शाहूंचे समतेचे विचार इतके रुजले आहेत की त्या विचारातूनच देश पुढे जाणार आहे. यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांना लोकसभेत पाठवण्याची गरज आहे. आज देशात शेतकऱ्यांनी तरुणांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शेतकऱ्यांवर अन्याय आणि महिलावर अत्याचार होत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून खाजगी शाळा वाढत आहेत. राज्यातील अनेक उद्योगधंदे गुजरातला नेत आहेत.
यावेळी रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे आपले उमेदवार हे खरे सोन्यासारखे असून त्यांचे आचार विचार आणि कृतीतून ते स्पष्टपणे दिसत आहे. तर विरोधी उमेदवार असलेले हे अतिशय खोटारडे, बेन्टेक्स सोने असल्याने त्यांना त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरातील कोल्हापूरच्या सभेत विकासाबद्दल काहीच बोलत नाहीत, तर ते फक्त जाती धर्माबद्दल बोलतात. द्वेष निर्माण करतात. हे कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात चालणार नाही आणि कोल्हापूरची जनता जनता सात तारखेला आपल्या मतातून ते निश्चितपणे दाखवून देईल.
माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, 40 जागा जिंकणार म्हणणारे फोडाफोडीचे राजकारण का करतात? देशात भाजपाचा ठराविक समाज आणि व्यक्तीसाठी कारभार सुरु आहे. आमचे हिंदुत्व अठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारे शिवरायांचे हिंदुत्व शिवराय आणि राजर्षी शाहूचे हिंदुत्व आहे. आम्ही राजकारणसाठी हिंदुत्वाचा वापर करत नाही. आज शहराला विद्यमान खासदारांनी काय दिले हे विचारण्याची गरज आहे. फक्त हजारो कोटीच्या घोषणा केल्या. प्रत्यक्ष काहीच मिळाले नाही. दिल्लीसमोर झुकायचे नसेल तर शाहू महाराजांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवा असे आवाहनही त्यांनी केले.
आ. जयश्री जाधव म्हणाल्या, छत्रपती शाहू महाराज हे निष्कलंक आणि पारदर्शक उमेदवार आहेत. ते कोल्हापूरची अस्मिता आहेत. या गादीचा मान आपण सगळ्यांनी राखला पाहिजे. यासाठी शाहू महाराजांना निवडून देऊ या.
यावेळी सरलाताई पाटील, आर. के. पोवार, कॉ. दिलीप पोवार, आपचे संदीप देसाई, हर्षल सुर्वे, माजी महापौर मारुतराव कातवरे, हिदायत मणेर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी, माजी नगरसेविका पद्मा तिवले, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, रामराजे बदाले, अनिल घाटगे यांच्यासह या परिसरातील सर्व समाजातील नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.