डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना घेऊन कार्यरत असलेल्या पक्षांनी महिलांना निवडणुकीत समान संधी उपलब्ध करून द्यावी, लोकसभेला महिलांना 50% उमेदवारी द्यावी.
कोल्हापूर :आवाज इंडिया
महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सहभागासाठी व आजच्या महिला प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच महिलांच्या होणाऱ्या घुसमटीला पर्याय देणे करिता सक्षम राजकीय पर्याय उभे राहणे गरजेचे आहे व त्यासाठी तळागाळातील महिलांच्या पर्यंत पोहोचणार असा निर्धार आंबेडकरी चळवळीच्या नेत्या रूपाताई वायदंडे यांनी केला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या महिला शक्ती परिषदेमध्ये परिषदेच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना 33% उमेदवारी द्यावी. महिलांच्या सर्वच राजकीय सामाजिक सहभागासाठी यापुढे ताकतीने प्रयत्न करणार असल्याचा निश्चयही त्यांनी बोलून दाखविला. अन्याय-अत्याचार करणाऱ्यांना रोखण्यासाठी शासनाने फास्टट्रॅक कोर्टात केसेस चालवून तातडीने न्याय दावा अशी भूमिका ही त्यांनी यावेळेस व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना घेऊन कार्यरत आहे म्हणणार्या रिपब्लिकन पक्षांच्यामध्ये सुद्धा महिलांवर होणारा अन्याय व घुसमट चिंताजनक आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
परिषदेच्या वतीने ८ महत्त्वाचे ठराव करण्यात आले. ते पुढील प्रमाणे,
ठराव क्रमांक १:
सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात महिलांचा सन्मानपूर्वक सहभाग ही राष्ट्र उन्नतीची खरी गरज आहे म्हणून आज महिला परिषदेद्वारे ठराव करण्यात येतो की उपरोक्त सर्व क्षेत्रांमधील महिलांचा सहभाग जाणीवपूर्वक वाढवण्यासाठी महिलांचे 33% आरक्षण धोरणाची अंमलबजावणी काटकरपणे व्हावी.
ठराव क्रमांक २:
महिलांना मंदिराचे पुजारी बनवण्यापेक्षा महिलांना न्यायालयात न्यायमूर्ती व विद्यापीठात कुलगुरू बनवण्यासाठी शासनाने गांभीर्याने कायदे करून त्याची अंमलबजावणी तातडीने करावी.
ठराव क्रमांक ३:
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना घेऊन कार्यरत असलेले रिपब्लिकन पक्ष व अन्य पक्ष संघटनेत महिलांना पक्ष संघटनेबरोबरच निवडणुकीत समान संधी उपलब्ध करून द्यावी, किमान जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, अशासकीय मंडळातील प्रतिनिधित्व देताना महिलांना प्राधान्य द्यावे. 50% आरक्षण महिलांसाठी करावे.
ठराव क्रमांक ४:
आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी महिलांसाठी किमान 33% उमेदवारी द्यावी.
ठराव क्रमांक ५:
महिलांवरील अत्याचार व स्त्रीभ्रूण हत्येबाबत कठोर कायदे करून जलद गती न्यायालयांमध्ये खटले चालवून अत्याच्यारांना तातडीने शासन करावे.
ठराव क्रमांक ६:
विटभट्टी मजूर, ऊसतोड महिला व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शासनाने विशेष हक्क देऊन सहकार्य करावे.
ठराव क्रमांक ७:
घरेलू हिंसाचार कायदा कठोरपणे राबवावा व विधवा, परितक्त्या महिलांना दिले जाणारे सानुग्रह अनुदान तातडीने मिळावे.
ठराव क्रमांक ८:
मायक्रो फायनान्स कंपन्याद्वारे महिलांकडे कर्ज वसुलीसाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब होतो. केवळ सणदशीर, कायदेशीर मार्गानेच कर्ज परतफेड करून घ्यावी. अन्यायी वसुली विरोधात ही परिषद एकमुखाने विरोध करते. महिलांचे या कंपन्यांद्वारे होणारे मानसिक व आर्थिक शोषण थांबविण्यासाठी सुज्ञ कायदेशीर पथक नेमून चौकशी व्हावी.
इ. ठराव सदर परिषदेमध्ये एकमुखाने पारित करण्यात आले व देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना सदर ठराव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या माध्यमातून पाठविण्यात येणार असून, सदर ठरावा संदर्भात मंत्रीमहोदयांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही रूपाताई वायदंडे यांनी नमूद केले.
यावेळी प्रवाहाच्या विरोधात जाऊन सामाजिक समतेसाठी भरीव योगदान देणाऱ्या तृतीयपंथी सौ. दुर्गा रणजीत पिसाळ यांना विशेष समाज परिवर्तन पुरस्काराने तर प्रा. पुष्पलता मच्छिंद्र सकटे, डॉ. शोभा चाळके, शिवालि आवळे, डॉ. दीप्ती चौगुले, वर्षा मोहिते, वनिता सावर्डेकर, संपदा मुळेकर, पूनम मेधावी यांना रिपब्लिकन महिला शक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
या परिषदेत भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, प्रा. डॉ. विजय काळेबाग, अनिल म्हमाने, सातारा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योत्स्ना सरतापे, अॅड. करुणा विमल, प्रा. डॉ. स्मिता गिरी यांची भाषणे झाली. तर बंडखोर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे, दलित महासंघाचे ज्येष्ठ नेते लालासाहेब नाईक, लहूजी साळवी प्रतिष्ठानचे अक्षय साळवी, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते दावीद भोरे, बाळासाहेब साळवी, प्रशांत अवघडे विशेष उपस्थित होते.
परिषदेला पुष्पाताई नलवडे, छाया बाबर, मायादेवी हळदीकर, सुनिता लोंढे, सुवर्णा तांदळे, डॉ. छाया साठे, संगीता पवार, साधना परीट, वंदना वायदंडे, निकिता खोबरे, प्रताप बाबर, रणजीत हळदीकर, दयानंद दाभाडे, सरदार आमशीकर, अमर तांदळे, शेखर कुरणे, अमर कदम, दिलीप कोथळीकर, दयानंद कांबळे, कृष्णात कांबळे, अविनाश भोसले, बटू भामटेकर, विकास बुरुंगले, संभाजी भोसले, बाळासाहेब कळंबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी तुडुंब भरलेल्या हॉलमधील उपस्थितां समोर रूपाताई वायदंडे यांनी प्रचंड उष्म्यातसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मनस्वी आभार मानले. सूत्रसंचालन दीपक काळे यांनी केले.