![](_AwajIndia/u/pos/202405/1002134239--800.jpg)
‘
------------------------------------------------------------------------------------------
अवनि संस्था गेल्या २८ वर्षापासून महिला व बालकांच्या अधिकारासाठी कार्यरत असणारी सेवाभावी संस्था आहे. प्रा. स्वर्गीय अरुण चव्हाण हे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष होते. तसेच डॉ. अरुण गांधी (राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू ) यांनी अवनि संस्थेला गेले २५ वर्षे अविरतपणे मदत केली आहे. प्रा. अरुण चव्हाण व डॉ. अरुण गांधी यांची घनिष्ट मैत्री होती. त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे अवनि संस्था असंख्य बालकाना व महिलाना न्याय देऊ शकली. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विचारांचे कार्य करणाऱ्या व सेवाभावी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या दिवंगत अॅड. दिलशाद मुजावर मा. सदस्य तृतीय पंथीय कल्याणकारी महामंडळ व मा. सदस्य बाल कल्याण समिती,कोल्हापूर यांना मरणोत्तर “अरुणोदय पुरस्कार २०२४” दि. २२/०५/२०२४ रोजी दु ०४.०० वाजता, हॉटेल ओपल, कोल्हापूर येथे जेष्ठ साहित्यक प्रा. डॉ. राजन गवस यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांचे पती अॅड. संजय मुंगळे व कन्या संजना मुंगळे स्विकारणार आहेत. पुरस्कार देण्यामागील उद्देश हा की, अॅड. दिलशाद मुजावर यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य हे कायमस्वरूपी स्मरणात राहणे आवश्यक आहे. व्यक्ती संपते पण कार्य व त्यांचे विचार कधीच संपत नसतात. त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा नवीन युवक पिढीना मिळावी या उद्देशाने मरणोत्तर पुरस्कार अॅड. दिलशाद मुजावर यांना प्रदान करण्यात येणार आहे. अॅड. दिलशाद मुजावर यांनी बालकांच्या विविध कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण, बालकामगार प्रथा निर्मूलनाचे काम केले. त्यांनी बाल कल्याण समिती सदस्य तसेच तृतीय पंथी कल्याणकारी महामंडळ महाराष्ट्र राज्य सदस्य, कोर्टात दिवाणी फौजदारी व सहकारी कोर्टात वकिली केली. त्याचप्रमाणे रोटरी क्लब इचलकरंजी येथे सदस्य म्हणून काम केले. किशोरी मुलीना महाविद्यालयामध्ये व्याख्यानद्वारे प्रबोधन केले. गरीब मुलीना सायकलीचे वाटप, महिला बचत गटाच्या स्त्रियांना कायदेशीर मार्गदर्शन करून अशा पद्धतीने त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. कोविड काळामध्ये तृतीय पंथीयांना अॅड. दिलशाद मुजावर यांनी विशेष मदत केली.
इचलकरंजी शहर परिसरातील २५० ते ३०० तृतीय पंथीय यांना त्यांच्याकडे त्यांची मतदान ओळखपत्रे व आधार ओळखपत्र देण्याकरिता प्रयत्न केले. तृतीय पंथीयांची अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रथमच सन २०१८-१९ या वार्षिक अर्थसंकल्पांत इचलकरंजी नगरपालिकेकडून २५ लाखांची तरतूद मा. जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडून मंजूर करून घेतली. त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठात पुणे या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या देशातील विद्यापीठात मानवी हक्क व सामाजिक सलोखा या विषयावर राष्ट्रीय चर्चा सत्रात प्रमुख वक्ता म्हणून पुणे विद्यापीठाने मान दिला.
अॅड. दिलशाद मुजावर यांनी महिला, बालके व तृतिय पंथीय या घटकांसोबत २५ वर्षांपेक्षा जास्त केलेल्या कार्याचा गौरव म्हणून अवनि संस्थेमार्फत त्यांना मरणोत्तर “अरुणोदय पुरस्कार २०२४” जेष्ठ साहित्यक प्रा. डॉ. राजन गवस यांच्या हस्ते तर मा. डॉ रेश्मा पवार, मा. आर. वाय. पाटील (सर), मा. मयुरी आळवेकर, मा. स्मिता वदन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम १०,०००/- रु व सन्मानचिन्ह, मानपत्र असे असणार आहे, अशी माहिती अवनि संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी अवनि संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, प्रा.अर्चना जगतकर, साताप्पा मोहिते जैनुद्दीन पन्हाळकर यांची उपस्थिती होती.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
संपर्क : साताप्पा मोहिते – ७७५७०९११०० / ७८८७३०८५२८