Awaj India
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्या

जाहिरात

 

कशासाठी.... दुधासाठी

schedule21 Jul 20 person by visibility 1794 categoryसंपादकीय

    
कशासाठी.... दुधासाठी
 
आवाज इंडिया लाइव्ह न्यूज प्रतिनिधी
अनुराधा कदम
वेळ सोमवारी सकाळी साडेअकराची. कोल्हापुरात लॉकडाउनचा पहिलाच दिवस. रविवारी रात्री त्या माऊलीने तान्हुल्यासाठी दूध आणून ठेवलं. सोमवारी ते दूध तापवताना नासलं. आठ महिन्याचं बाळ दुधासाठी रडू लागल्यावर ती आई दूध आणण्यासाठी बाहेर पडली. मास्क, सॅनिटायझरसह सगळी काळजी तिने घेतली. दूध जीवनावश्यक घटकात येत असलं तरी सकाळी सहा ते नऊ ही वेळ दूध आणण्यासाठी दिली आहे. लेकराच्या दुधासाठी बाहेर पडलेली ती आई या वेळेच्या परीघाबाहेर होती. माऊली घरापासूनच्या पुढच्या चौकात येताच तिला पोलिसांनी अडवलं. बाळाला दूध आणायला आलेय असं सांगूनही तिला पुढे सोडलं नाही. दूध आदल्या दिवशी आणून ठेवायचं… नासणार हे गृहित धरून फ्रीजमध्ये ठेवायचं अशा पर्यायांची शिदोरी देऊन नकारघंटा वाजवत पोलिसांनी तिला माघारी धाडलं. हे सगळं त्या रस्त्यावर असलेला एक नागरीक घराच्या गच्चीतून पाहत होता. त्याच्याही घरी लहान मूल असल्याने त्याने मिल्कपावडरचे पाऊच खरेदी केले होते. त्यातले दोन पाऊच त्या भल्या माणसाने माऊलीकडे सोपवले आणि पर्याय केवळ सांगितला नाही तर तो तिला उपलब्ध करून दिला. बाळाच्या एक कप दुधासाठी माऊलीला नियमाच्या कात्रीत अडकवले. मग… दूध आंदोलनात हजारो लिटर दूधाचे पाट ओतणाऱ्या आंदोलकांसाठी रस्त्यावरच्या पोलिसांची शिट्टी का वाजली नाही… लॉकडाउन नियमाचे पारायण का केले गेले नाही. बुलढाण्यात आंदोलकांनी दुधाने आंघोळ केली. सांगलीत महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार ओतली गेली. कोल्हापुरात दुधाच्या टँकरचा नळ सोडण्यात आला. हे सगळं लॉकलाउनच्या दुसऱ्या दिवशी भर रस्त्यात सुरू होतं. मान्य शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे…पण इतकं मस्तीला येणाऱ्या आंदोलकांना बालसंकुलातील तान्हुल्यांची…वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची…गेल्या चार महिन्यांपासून पाठीला चिकटलेल्या पोटाला चिमटा देत जगणाऱ्या गोरगरीबांची आठवण का झाली नाही…? आंदोलक हा संवेदनशील असावा लागतो… शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारा तर संवेदनशील असावाच… एकीकडे लेकराच्या दुधाची तहान भागवण्यासाठी घराबाहेर आलेल्या माऊलीला नियमाचा दंडुका…आणि दुसरीकडे आंदोलनाच्या नावावर दुधाचा अपमान करणाऱ्यांना अभय… ? कोरोना कधी ना कधी जाईल…पण या वृत्तीचा संसर्ग नक्कीच समाजाला पोखरेल अशी भीती आहे.
@अनुराधा कदम

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes