दिव्यांग पेन्शनसाठी ‘प्रहार’ आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
schedule19 May 26 person by visibility 45 categoryराजकीय
आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर :
संजय गांधी निराधार पेन्शन योजनेतील जाचक तांत्रिक अटी आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील तब्बल ११ हजार ७७ दिव्यांगांची पेन्शन गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याच्या निषेधार्थ प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘पेन्शन बचाव आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते.
शासनाने दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये हयातीचा दाखला, दिव्यांग यूडीआयडी कार्ड, अद्ययावत आधार कार्ड तसेच बँक खात्याशी आधार संलग्न करणे (बँक सीडिंग) यांसारख्या नवीन तांत्रिक अटी लागू केल्या आहेत. मात्र, या बदलांबाबत प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी जनजागृती करण्यात आली नसल्याने हजारो लाभार्थी अद्ययावतीकरण प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. परिणामी, अनेक दिव्यांगांच्या पेन्शन थांबल्या असून ऐन महागाईच्या काळात त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराच्या निषेधार्थ महावीर उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चामध्ये “पेन्शन आमचा अधिकार”, “पेन्शन आमच्या हक्काची”, “अपंग एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. रखडलेली पेन्शन तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, तांत्रिक अटी सुलभ कराव्यात आणि प्रशासनाने विशेष मोहीम राबवून दिव्यांगांना मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अरुण विभुते, जयश्री शिंदे, शैलेश वापीकर, सईद पिरजादे, प्रदीप आयगुळे, संजय पोवार, रावसाहेब मिठारी, रंजना गुलाईकर, उमेश चटके यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.