शिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमाली
schedule04 May 26 person by visibility 143 categoryशैक्षणिक
स्वर्गीय प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांना शोकसभेत कृतज्ञतापूर्वक श्रध्दांजली
*कोल्हापूर प्रतिनिधी*
शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यातून वेगळी छाप पाडणाऱ्या प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभा अत्यंत भावनिक वातावरणात पार पडली.
या शोकसभेला संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी आजीव सेवक, विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, गुरुदेव कार्यकर्ते, तसेच सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, विद्यार्थी आणि साळुंखे व गावडे परिवारातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात दाटलेले दुःख, ओलावलेल्या डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या आठवणी आणि प्रत्येकाच्या मनात घर करून राहिलेली त्यांची कार्यमग्न प्रतिमा वातावरण अधिकच भावूक करत होती.
शोकसभेची सुरुवात प्राचार्या सौ. शुभांगी गावडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने वातावरण गंभीर व प्रेरणादायी झाले. प्रा. महेश हिरेमठ यांनी सादर केलेल्या अभंगाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला आणि अनेकांच्या भावना दाटून आल्या.
प्रास्ताविकात प्रा. अशोक पाटील यांनी सौ. गावडे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याच्या भावना अधोरेखित केल्या. सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील व डॉ. कविता तिवडे यांनी संयत आणि भावपूर्ण शब्दांत केले.
शोकसभेची सांगता संत ज्ञानेश्वरांच्या ‘पसायदान’ने करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सौ. शुभांगी गावडे यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील एक समर्पित, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याची उणीव दीर्घकाळ जाणवत राहणार आहे.