सहा हजार देऊन साठ हजार काढून घेणारे भाजप सरकार
अभिषेक शिंपी यांचा टोला
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ गवसे येथे भव्य प्रचारसभा
आजरा : प्रतिनिधी
शेतकर्याची वर्षाला सहा हजारावर बोळवण करून कर रूपानं 60 हजार रूपये खोर्यानं आपल्या पदरात पाडून घेणारे भाजपचे हे देशाच्या इतिहासातील पहिलेच सरकार आहे असा टोला आजऱ्याचे नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी मारला. अशा या सरकारला खाली खेचण्यासाठी शाहू महाराज यांना दिल्लीत पाठवा असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या गवसे येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे देशामध्ये अघोषित अशी आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजप सरकार हे सर्वसामान्यांचे की अंबानी-अदानींचे असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाली आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा अहवाल आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. जातीधर्मात तेढ वाढत आहे. आजवरचा अबाधित सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. हे भाजप सरकारचे पाप आहे. मात्र काँगे्रस नेते राहुल गांधी प्रेमाचा संदेश देशभर पसरवत आहेत. अन्नसुरक्षा सारखा महत्त्वपूर्ण कायदा काँग्रेसने केला. पण त्याचे श्रेय मोदी सरकार लाटण्याचा प्रयत्न करत आहे.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, देशामध्ये घातक धोरणे राबवली जात आहेत. शेतकर्यांचा पैसा कर रूपाने भरमसाठ प्रमाणात वसूल करून किरकोळ मदतीचा डांगोरा पिटण्याचे काम भाजप करीत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष मासोळे म्हणाले, वंचित आघाडी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू छत्रपतींच्या पाठीशी आहे. त्यांना विजयी करण्यासाठी बांधील आहे.
शाहू छत्रपती म्हणाले, देशामध्ये विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांमध्ये हुकूमशाही सुरू झाली आहे. आता पुन्हा एक वेळ लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भाजप सरकारला पराभूत करण्याची गरज आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक गेली चार वर्षे झालेली नाही. भविष्यामध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुकांबाबतही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही शाहू छत्रपतींनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, ए. वाय. पाटील, कॉ. संपत देसाई, संभाजी पाटील, उमेश आपटे, मुकुंदराव देसाई, उत्तम देसाई, शिवाजी पाटील, उदय पवार, रणजीत देसाई, संजयभाऊ सावंत, राजेंद्रसिंह सावंत, प्रकाश मोरूस्कर, निवृत्ती कांबळे, युवराज पोवार, अंकुश पाटील, मुकुंदराव तानवडे, कॉ. शांताराम पाटील, अविनाश हेब्बाळकर, संतोष नेवगे, उदयराज पवार, किरण तानवडे, किरण कांबळे, सिद्धार्थ तेजम, अनिकेत कवळेकर यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.