कोल्हापूर : आवाज इंडिया
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन हे लोकाभिमुख होते विद्यमान लोकशाहीमध्ये या तत्त्वांचा अंगीकार केल्यास स्वराज्य निर्माण होईल यात शंका नाही, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. कपिल राजहंस यांनी केले, इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयात आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी एस पाटील होते.
यावेळी बोलताना डॉ. राजहंस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासन व्यवस्था आज जगभरातील अनेक देशांमध्ये विशेष अभ्यासली जाते. केवळ लढाया आणि मोहिमा यांच्या प्रति शिवाजी महाराजांचे कार्य मर्यादित नव्हते तर त्याही पलीकडे जाऊन जगण्याचा मूलमंत्र देणारी छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी आणि मुलकी प्रशासन व्यवस्था होती. प्रत्येक मोहिमेचे सुयोग्य नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी, मोहिमेतील सर्व शक्यता गृहीत धरून माणसांची योग्य पेरणी या सर्व नेतृत्वगुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षानंतर सुद्धा आपणा सर्वांसाठी आदर्श आहेत. मानवी विकास साधायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे केवळ गुणगान करून चालणार नाही तर ते चरित्र आत्मसात करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
यावेळी बोलताना प्राचार्य बी एस पाटील म्हणाले की, राजनितिज्ञ म्हणून शिवाजी महाराजांचा अभ्यास आज होणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेत शिवचरित्र अभ्यासल्यास भविष्याचा भक्कम पाया रचण्यास मदत होईल.
यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ. माधुरी खोत, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. शांताराम कांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक प्रा. डॉ. वैजयंता पाटील, कॉमर्स विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शकुंतला पाटील, प्रा. सुरज मुल्ला, प्रा. गजेंद्र माळी, प्रा. विजय साठे, प्रा. संपतराव जाधव, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.