भोगावती ता. २१ : गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना मानणारे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते खासदार संजय मंडलिक यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभारतील आणि त्यांना उच्चांकी मताधिक्य देण्यामध्ये मोठा वाटा उचलतील. असा विश्वास गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी व्यक्त केला.
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, रिपाई, रासप , जनसुराज्य व समविचारी महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या समर्थनार्थ भोगावतीमध्ये अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवर व अरुण डोगळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले," दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी कागलचा विरोध पत्करून गैबी बोगद्यातून दिलेल्या ९ टीएमसी पाण्याची कृतज्ञ आठवण भोगावतीकरांनी ठेवून संजय मंडलिक यांना मतदान करावे. काळम्मावाडी धरणातील पंचगंगेच्या वाट्याचे पाणी देण्यावरून कागलचा विरोध होता. पण तत्कालीन पाटबंधारे मंत्री खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी गैबी बोगद्याला परवानगी दिली होती. हा इतिहास देखील भोगावतीकरांनी लक्षात ठेवावा. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हॅटट्रिक करण्यासाठी खासदार मंडलिक यांना मताधिक्य द्या. अरुण डोंगळे यांच्या मागे मी हिमालया प्रमाणे उभा आहे." अशी ग्वाहीही ना. मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, "एखाद्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांची झालेली चूकभूल क्षम्य असू शकते. पण लोकसभेतील चूकभूल ही देशाला न परवडणारी आहे. तसे झाल्यास देश ५० वर्षाने मागे जाईल. निवडणूक प्रचारामध्ये केलेली विकास कामे आणि मतदारसंघापुढील व्हिजन यावरच चर्चा आम्ही करतो. विरोधी गटाने देखील हीच प्रचाराची पद्धत ठेवावी. भावनिक आवाहन करून आम्हाला जनतेची फसगत करायची नाही. भोगावती परिसराच्या उर्वरित विकासासाठी मी वचनबद्ध आहे."
अभिषेक डोंगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मेळाव्यात राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. सुरेश कुराडे, प्रा. अमर पाटील, चंद्रकांत पाटील, बबलू वळगड्डी यांच्यासह अनेकांनी मनोगते मांडली. आभार सोळांकुरचे माजी सरपंच कुंडलिक पाटील यांनी मानले.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तर भोगावतीस ४०० कोटींचे अर्थसहाय्य
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मागणी झाल्यास भोगावती उर्जितअवस्थेत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत एनसीडीसी कडून ४०० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना दिली.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,