जिल्ह्याचा पुढील ५० वर्षांचा सर्वंकष विकासाचा आराखडा तयार : संयोगिताराजे
कोल्हापूर : मी शिवसेनेचा नगरसेवक होतो. शिवसेनेचेच खासदार असल्याने संजय मंडलिक यांना विकास कामाच्या निधीसाठी भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण पाच वर्षात त्यांनी माझा एकदाही फोन घेतला नाही तसेच त्यांचा संपर्कही झाला नाही, अशी व्यथा माजी नगरसेवक नियाज खान यांनी व्यक्त करताच उपस्थित नागरिकही अवाक् झाले. दरम्यान, पुढील ५० वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाचा आराखडा संभाजीराजे छत्रपती यांनी तयार केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यावर आम्ही यापुढे भर देणार आहोत. या कार्याला चालना मिळण्यासाठी शाहू छत्रपती यांना दिल्लीला पाठवूया, असे प्रतिपादन संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
शास्त्रीनगर, जवाहरनगर भागात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ संयोगिताराजे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत या प्रभागातील माजी नगरसेवक नियाज खान आणि त्यांचे कुटुंबीय होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत नियाज खान बोलत होते.
ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट घेतले. ते निवडून आले खरे, पण गेल्या पाच वर्षात परत फिरकलेच नाहीत. प्रभागासाठी विकासनिधी मिळावा म्हणून त्यांना भेटण्यासाठी अनेक वेळा हेलपाटे घातले. पण ते भेटले नाहीत. फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एकदाही माझा फोन घेतला नाही. एकदा मी वेळवेगवेगळ्या ११ जणांच्या फोनवरून त्यांना फोन केला. एकदाही त्यांनी फोन उचलला नाही. माझ्यासारख्या शिवसेनेच्या नगरसेवकाची ही अवस्था झाली असेल तर गेल्या पाच वर्षात सामान्य माणसाचे काय झाले असेल, याचा विचार करा आणि आता सर्वसामान्यांना कायम उपलब्ध असणारे शाहू छत्रपती यांनाच निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.
संयोगिताराजे यांनी कष्टकरी महिलांची भेट घेतली, तेव्हा या महिलांनी आम्ही महाराजांनाच मत द्यायचं हे आधीच ठरवलयं, असे सांगितले. जयंती अपार्टमेंट, स्नेहल पार्क यासह विविध भागात जाऊन संयोगिता राजे यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी आशिष माने, ऋतुजा चव्हाण, नृसिंह देशपांडे, ज्योती माने, नयना माने, स्वप्निल माने, शीतल माने, वरूण माने, गौरी माने, श्रीलेखा माने, भारती सनगर, वंदना देसाई, सागरिका सूर्यवंशी, रवी माने तसेच शेखर खानविलकर, धनश्री खानविलकर, सुधीर तडवळकर, सहदेव चव्हाण, रवींद्र कानगो, निशा तडवळकर, प्रशांत पवार, उर्मिला खाडे, शितल खाडे, प्रियांका संघवी आदी उपस्थित होते.