शाहू छत्रपतींची भावनिक साद; शेतमाल प्रक्रियेसह नवे उद्योग आणून सुखी-समृद्ध तालुका घडवण्यास साथ देण्याचे आवाहन
कोल्हापूर : छत्रपती घराणे आणि राधानगरीचा परिसर यांच्यामध्ये अनोखे नाते आहे.... भावनिक बंध आहेत.... या तालुक्याशी आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत! न्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर आमचं दुसरं घर आहे. अशा या भागात पर्यटन, शेतीमालावर प्रक्रिया करणार्या उद्योगासह परिसराला पूरक असणार्या उद्योगातून तरूणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करणे शक्य आहे. यासाठी आपण सर्वजण एकाच छताखाली येऊया,’ अशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी जनतेला भावनिक साद घातली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ फेजिवडे (ता. राधानगरी) येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत पाठिंबा व्यक्त केला. यावेळी शाहू छत्रपतींचे मोठ्या उत्साहात ठिठिकाणी स्वागत करण्यात आले.
जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, राजेंद्र मोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, सुधाकर साळोखे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, सरपंच प्रतिभा कासार, माजी सरपंच फारुख नावळेकर, दादासो सांगावकर, उत्तम पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शाहू छत्रपती यांनी उपस्थितांशी संवाद साधताना राजर्षी शाहू महाराज यांच्यापासून राधानगरीशी निगडीत आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले ‘राजर्षी शाहू महाराज फेजिवडे परिसरात शिकारीसाठी सातत्याने येत असत. त्या कालावधीत त्यांनी जागा निवडून धरणाच्या निर्मितीला सुरुवात केली. या भागातील शेतकरी सुखी झाला पाहिजे ही त्या मागील भावना होती. राधानगरी धरणामुळे भोगावती आणि पंचगंगा खोरे समृद्ध झाले.’
ते पुढे म्हणाले, ‘राधानगरी तालुका हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. दाजीपूर अभयारण्याची रचना शहाजी महाराजांच्या काळात झाली. या अभयारण्यमुळे पर्यटन वाढ होत आहे. पर्यटनवृद्धीच्या माध्यमातून तरुणांच्या हाती काम मिळेल. रोजगार निर्माण होईल. राधानगरीचा सर्वांगिण विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून काम करू. संपर्कात कुठेही कमी पडणार नाही. पहिले जनसंपर्क कार्यालय राधानगरीत सुरू होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
.....................
राजे करवीरकर, शाहूराजांचे वारसदार!
राधानगरीत शाहू छत्रपतींचे अनोख्या पद्धतीने स्वागत झाले. त्यांचे आगमन होताच पडळीपैकी कासारवाडी येथील कासार समाजातील कलाकारांनी घुमकं, झांज या पारंपरिक वाद्यांचा गजर केला. लोकगीतांतून राजर्षी शाहू महाराजांना वंदना दिली.
‘शाहू छत्रपती महाराज- केला तलावाचा आधार हो रे,
नाव ठेवीन लक्ष्मी तळे-राधानगरी आहे जवळ! हो छत्रपती राजे हो,
राजे करवीरकर -शाहू राजांचे वारसदार
या लोकगीतातून त्यांनी छत्रपती कुटुंबांचा महिमा गायला. यावेळी राधानगरीतील लोककलाकारांनी दिवट्या प्रज्वलित करून फेर धरला होता.