शाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको
आमदार सतेज पाटील यांचा मंडलिकांना सवाल
कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत शाहू छत्रपतींचा आशिर्वाद घेण्यासाठी वाड्यावर गेलेले चालते पण २०२४ च्या निवडणूकीत त्यांची उमेदवारी चालत नाही. हा दुट्टपीपणा बंद झाला पाहिजे असे सांगतानाच मागील निवडणुकीत अजिंक्यताराच्या किती पायऱ्या आपण भिजवल्या झिजवल्या असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांना केला. तिकिटासाठी वणवण फिरावे लागले यातूनच जनेतेच्या मनातून मंडलिकांची विश्वासार्हता संपली आहे, अशी घणाघातील टीकाही त्यांनी केली.
मिरजकर तिकटी येथील इंडिया आघाडी, महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत आमदार सतेज पाटील बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती, आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे छत्रपती, शिवसेना उप नेते जिल्हा प्रमुख संजय पवार, सह संपर्क नेते विजय देवणे, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले.
आमदार सतेज पाटील म्हणााले, २००९ च्या निवडणूकीत संभाजीराजे आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याविरुध्द निवडणूक झाली पण खासदार सदाशिवराव मंडलिकाबद्दल निवडणूक प्रचारात कोणीही वाईट शब्द बोलले नाहीत. त्यांच्या वयाच्या मान राखला. या निवडणूकीत टीकेची पातळी ओलांडायची नाही असा निर्णय जिल्ह्यातील नेतेमंडळींनी घेतला होता. पण शाहू महाराजांच्या गादीचा मान न ठेवता खासदार मंडलिक टीका करत आहेत. त्यांनी असे धाडस करु नये अशी सूचना आमदार पाटील यांनी दिली.
२०१९ च्या निवडणूकीत मदत का केली, अजिंक्यताराच्या शाखा तालुक्यात काढणार अशी टीका करणाऱ्या मंडलिकांचाही सतेज पाटील यांनी समाचार घेतला. २०१९ च्या निवडणूकीत मंडलिकांनी अजिंक्यताराच्या पायऱ्या झिजवल्या. रात्री किती उशिर झाला तरी अजिंक्यताराची पायरी उतरल्याशिवाय ते घरी जात नव्हते हे विद्यमान खासदार विसरले आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून आणि राजकीय अभिनेशातून कोल्हापूरच्या जनतेने संजय मंडलिकांना मदत केली. पण असं काय झाले की एका रात्रीत तुम्ही दुसऱ्या पक्षात गेला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विकास कामे केली असा दावा करत असताना असतानाही उमेदवारीच्या पहिल्या यादीत नाव आले नाही. उमेदवारीसाठी तुम्हाला सैरावैरा पळायला लागली. यावरूनच जनेतून तुमची विश्वासार्हता संपली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, देशात काँग्रेसने विकासाचा पाया घातला. देश स्वातंत्र्य झाल्यावर भाक्रा नानगल, कोयना, कोल्हापूर जिल्ह्यात वारणा, काळम्मावाडी ही मोठी धरणे बांधली. दहा वर्षात एकही नवीन धरण, आणि विजेसाठी अणुभट्टी बांधलेले नाही. कोल्हापूरात हायकोर्टाचे सर्कीट बेंचची उभारणी, पंचगंगा प्रदूषण मुक्ती, युवकांना नोकरीसाठी आयटी पार्क, पर्यटनाला चालना, विमानतळ आणि रेल्वे यंत्रणात सुधारणा, खेळासाठी नवीन क्रीडांगणे या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले.
एका रात्रीत भूमिका बदलून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या मंडलिकांवर टीका करताना संजय पवार यांनी खासदार मंडलिक हे बेंटेक्स आहेत आणि शाहू महाराज अस्सल सोने आहेत असे म्हणाले, भारती पोवार म्हणाल्या, माजी खासदार सदाशिवराव मंडलिकांनी साखर कारखाना उभारुन कारखाना कर्जमुक्त केला. पण संजय मंडलिकांनी कारखान्यावर कर्ज केल्याने दुसऱ्याला चालवायला देण्याची वेळ आणली आहे. कामगारांचे पगार झाले नाहीत. नेते आणि जनतेशी गद्दारी केली असल्याने ताराराणीच्या नगरीत गद्दारीला जनता निवडणूकीत उत्तर देईल असा इशाराही दिला. छत्रपतींच्यावर टीका करणाऱ्यांच्या छाताडावर बसू असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला. यावेळी आमदार जयश्री जाधव, वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आर.के. पोवार, शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी, शिवसेना युवा नेते हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक राजू लाटकर, प्राचार्य टी.एस. पाटील, कॉ. सतीशचंद्र कांबळे राजेंद्र ठोंबरे, अशोक पोवार, यांची भाषणे झाली.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शेकापचे संभाजीराव जगदाळे, समाजवादी पक्षाचे शिवाजीराव परुळेकर, जनता दलाचे वसंत पाटील, निरंजन कदम,वासिम फरास, जिल्हाप्रमुख विनायक साळोखे, हिंदकेसरी विनोद चौगुले, अनिल घाटगे, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, जयकुमार शिंदे, महिला काँग्रेसच्या सरलाताई पाटील, शिवसेनेचे उप नेते दिनेश साळोखे, नितिन शेळके उपस्थित होते.
टायटल साँगचे अनावरण
शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेतील १२ तालमींच्या अध्यक्षांच्या हस्ते शाहू छत्रपतींच्या प्रचारार्थ तयार केलेल्या छत्रपती या टायटल साँगचे अनावरण झाले. आमदार सतेज पाटील यांच्या कल्पनेतून हे टायटल साँग तयार करण्यात आले आहे.